
®अधिवेशन वृतसेवा, दिलीप शिंदे, सोयगाव दि.20 – शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत गृहविभागाचा डायल 112 या नंबर वर गोपनीय माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवणे आवश्यक असतांना गृहविभागाकडून संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना कारवाई करण्यासंबंधी सूचना देण्यात येते. मात्र संबंधित पोलीस हे अवैध धंदे वाईकाना 112 वर माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय न ठेवता अवैधधंदे वाईकांना सांगित असल्याने संबंधित व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण करण्याचे काम सोयगाव पोलीस ठाण्यातील 112 वरून सूचना मिळालेल्या पोलीसाकडून केले जात आहे. 112 वर तक्रारी नंतर काय कारवाई करण्यात आली याची माहिती गुलदस्त्यात राहत असल्याने यामुळे पोलिसांना सहकार्य करावे कसे हा मोठा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.याबाबत गृहमंत्री व गृहविभागाचे सचिव यांनी दखल घेऊन संबंधित अधिकारी यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव शहरासह तालुक्यात जुगार,अवैधरित्या देशिदारू,गांजा व इतर अवैध धंद्यांनी कळस गाठला असून अवैधधंदे बंद करण्यात यावे यासाठी अनेकवेळा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते,ग्रामपंचायती व शिवसेनेची सत्ता असलेल्या सोयगाव नगरपंचायत च्या नगराध्यक्षासह नगरसेवक व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांची भेट घेऊन शहरात सुरू असलेले अवैधधंदे बंद करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी करूनही शहरातील अवैधधंदे बंद करण्यास स्थानिक व ग्रामीण पोलीस मुख्यालयाला यश आलेले नाही.शहरात जुगाराचे अड्डे असून यात गृहरक्षक (होमगार्ड) असलेल्याचा सुद्धा जुगार अड्डा आहे स्थानिक पोलिसांना सर्व माहिती असूनही आर्थिक लालचे पोटी अवैधधंदे बंद होत नसल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.अवैधधंध्यामुळे युवावर्ग व्यसनाधीन झाला असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून काहींचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.अवैधधंदे बंद करण्याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांची भेट घेत दिलेल्या निवेदनावर शिवसेनेचे नगरपंचायत गटनेते अक्षय काळे, कुणाल राजपूत, नगरसेवक तथा तालुका समादेशक संदीप सुरडकर आदींसह नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.जनतेच्या पैशातून सुखसुविधा भोगणारे अधिकारी, मंत्री याकडे लक्ष देणार की अनेकांचे संसार उध्वस्त होतांना बघणार हे पाहणे गरजेचे असणार आहे.
#112 डायल ची अशी घेतली जाते दखल
राज्यातील नागरिकांना एकाचवेळी सर्व प्रकारची मदत मिळावी. या उद्देशाने 112 डायल ही योजना सुरु करण्यात आली. यामध्ये तक्रारदार व्यक्तीचा तक्रारी कॉल प्रथम नवी मुंबईतील केंद्राला जातो. तेथे तक्रारी संदर्भात संपूर्ण माहिती घेऊन तो कॉल संबंधित जिल्ह्याला पाठविला जातो. तक्रार पाहून त्यावेळी तेथून जवळ असलेल्या पोलीस मार्शलला त्याची माहिती पाठविली जाते. मार्शल कॉल्सची पूर्तता करुन त्याची माहिती दिली जाते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. परंतु कारवाई बाबत 112 वर तक्रार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत अवगत केले जात नाही त्यामुळे 112 विषयी नागरिकांमधून अविश्वास दाखविला जात आहे.