
®अधिवेशन वृतसेवा, ठाणे : दि. 3 मार्च, बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बालकल्याणासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांची दखल घेऊन बालस्नेही पुरस्कार देण्यात येतो. सन २०२४ साठी कोकण विभागातून उत्कृष्ट पुरस्कार म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांना बालस्नेही पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह म्हणाल्या की महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा असण्यावर भर देण्यात येत आहे. बालकांच्या हक्काबद्दल माहिती देणे आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी चिराग ॲप विकसित करण्यात आले असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने मुलांना सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अध्यक्ष शाह यांनी सांगितले.
बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमांत आपला सक्रिय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वयंसेवी संस्थांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हाधिकारी, उत्कृष्ट विशेषगृह, उत्कृष्ट स्वयंप्रेरणेने सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रम, उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, उत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सी, पोलीस अधीक्षक, उत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्व, सहायक पोलीस आयुक्त, उत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, पोलीस उपनिरीक्षक, उत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उत्कृष्ट बाल कल्याण समिती, पोलीस हवालदार, उत्कृष्ट बालगृह, पोलीस शिपाई, बालस्नेही पुरस्कार, पोलीस अंमलदार, उत्कृष्ट परिविक्षा अधिकारी, उत्कृष्ट खुले निवारा गृह, उत्कृष्ट काळजी वाहक, उत्कृष्ट समुपदेशक, उत्कृष्ट विभागीय उपायुक्त यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार संजय केळकर, आमदार मनीषा कायंदे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अपर महासंचालक अश्वती दोर्जे, आयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरे, आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अवर सचिव वंदना जैन, शिक्षणाधिकारी माधुरी भोसले, सदस्य नीलिमा चव्हाण, जयश्री पालवे, सायली पालखेडकर, संजय सिंगल, चैतन्य पुरंदरे, आदी यावेळी उपस्थित होते. ★★★★★